Showing posts with label Politics. Show all posts
Showing posts with label Politics. Show all posts
Sunday, 6 November 2011
राष्ट्रवादीचे श्रीवर्धनमधील ‘मिशन तंटा’
श्रीवर्धन हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाण. श्रीवर्धनच्या उत्तरेला मुरुड-जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन शहर, दक्षिणेला सुप्रसिध्द हरिहरेश्वर मंदिर तसेच अतिशय स्वच्छ आणि देखणे समुद्र किनारे अशीच ओळख करुन देता येईल. स्वातंत्र्यापासून गेली अनेक वर्षे कोकणातील इतर भागाप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्षीत असेच हे ठिकाण होते. श्रीवर्धन मतदारसंघातून या राज्याला बॅरिस्टर अंतुलेंसारखे मुख्यमंत्री मिळाले. तरीही श्रीवर्धनची पहिली ओळख जगाला मिळाली ती १९९२ साली शेखाडी बंदरावर उतरले गेलेल्या जीवंत काडतूसांमुळेच.
स्वातंत्र्यानंतर ते १९९५ सालापर्य़ंत श्रीवर्धनमध्ये सातत्याने कॉंग्रेसचीच एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्यानंतर जवळपास ५० वर्षे इकडे रस्ते, पाणी आणि वीजेचे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत होते. आपण लोकप्रतिनीधींना विभागाचा विकास करण्यासाठी निवडून देतो, याबद्दल कदाचित तिथल्या जनतेला माहितीसुध्दा नसावी, इतकी भयानक अवस्था माजी मुख्यमंत्री अंतुलेसाहेबांच्या श्रीवर्धनची होती.
पण १९९५ नंतर श्रीवर्धनचे रुपडेच पालटून गेले. शामभाई सावंतांच्या रुपाने पहिला शिवसेनेचा आमदार या विभागाला मिळाला. श्रीवर्धनच्या सुदैवाने त्याचकाळी शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली. याआधी झालेली कोकणचा वाताहत बाळासाहेबांनी रोखली. कोकणात अनेक प्रकारची विकासकामे करण्याचे आदेश बाळासाहेंबांनी दिले. श्रीवर्धनचाही विकास झपाट्याने सुरु झाला. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी-पुरवठ्याची कामे हाती घेतली गेली. वीज नसलेल्या ठिकाणी वीज पोहचली, पायवाटेप्रमाणे असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. श्रीवर्धन शहराकडे जाण्यासाठी प्रत्येक गावात एसटी सुरु केली गेली. अतिदुर्गम गावांकडे शिवसेनेचा आमदार स्वत: जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करु लागला. आमदार आल्यानंतर शिवसेनेकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीही जनतेने दिली. गावांच्या विकासाला आणखी गती मिळाली, पर्यायाने हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
मागच्या विधानसभा निवडणूकीत एक अपघात झाला. श्रीवर्धन मतदार संघांची फेररचना झाली आणि गोरेगांव-मुरुड सारखा भाग मतदार संघातून वगळून माणगाव, तळा व रोहा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेला मोठा भाग या मतदारसंघाला जोडला गेला. श्रीवर्धनमधील जनतेला पैशांची भुल पाडून जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे खेचण्य़ात सुनिल तटकरेंना यश मिळाले व हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. पारंपारिक शिवसेनेच्या मतदानामध्ये काहीसा फरक झाला होता. श्रीवर्धनमध्ये अजूनही शिवसेनेचीच मोठी ताकद आहे. तटकरे हे सरकारमध्ये मंत्री असल्याने प्रशासकीय अधिकारी त्यांना दचकून असतात. परंतु खासदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही शिवसेनेकडेच असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे तशीच सुरु आहेत. त्याचवेळेस दोन वर्षे आमदारकीला होऊनही विकासकामांची फक्त उद्घाटने उरकली गेली आहेत, अजूनपर्यंत कामे काही होत नाहीत, निवडणूकांच्या काळात दिघी पोर्ट मध्ये नोकरीसाठीचे खोटे अर्जही भरले गेलेत, दिघी पोर्टचे अजून बरेच काम बाकी असल्याने इतक्यात तरी नोकऱ्यांसाठी भरती होणार नाही हे सत्य आहे, आणि जेव्हा भरती सुरु होईल तेव्हा ती फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांकडून होणार नाही हेही सत्य आहे.
श्रीवर्धनमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने न लागल्यास तटकरेंचे मंत्रीपद काढले जाऊ शकते, परिणामी तटकरेंची राजकीय कारकिर्द धोक्यात येऊ शकेल अशा प्रकारे बोलले जात आहे. म्हणून तटकरेंनी श्रीवर्धनमध्ये वेगळ्याच प्रकारचे राजकारण सुरु केले. गेली ५० वर्षे अतिशय शांतता असलेल्या गावांमधील काही विकाऊ लोकांना हाताशी धरून गावागावात तट (तट-करे नावातच सारे काही आहे) पाडण्याचे एककलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. पैसा आणि लोकांना दारू पाजून गावांचे आरोग्य खराब करण्याचे काम तटकऱ्यांच्या जुन्या मतदार संघात म्हणजेच माणगाव-तळ्यात केले होतेच. याच कारणाने मागच्या आठवड्य़ात श्रीवर्धन मतदार संघातील कादंळवाडा या गावाने राष्ट्रवादी पक्षाला गावबंदीचा निर्णय घेतलाय. श्रीवर्धनमधील १०० टक्के शिवसेनेला मतदान करणारे गाव म्हणून ओळख असलेल्या धारवली या गावानेही आता शिवसेना सोडून राष्ट्रवादीसहीत इतर सर्व पक्षांना कायमस्वरुपी गावबंदी घातली आहे आणि अशाप्रकारचे निर्णय नजिकच्या काळात इतर गावेही घेतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.
आपापले राजकारण करताना गावा-गावांत शांतता प्रस्थापित करणे हे खरे लोकप्रतिनीधीचे काम आहे, इथेतर तटकरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तंटामुक्ती अभियान राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच आणले परंतु अशा प्रकारे आपल्या पक्षाकडे लोक वळणार नसतील तर पैशाच्या जोरावर त्या गावाचे तुकडे पाडून गावातील कायमस्वरुपी अशांतता राबविण्याचे सगळीकडे जोरदार सुरु आहे. प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला भेट दिल्यास हे ‘मिशन तंटा’ उपक्रमाची सत्यता उलगडेल. इतकी वर्षे शिवसेना, कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या विभागात काम करत आहे. हिंदु-मुस्लिम दंगेही या विभागात झालेले आहेत. परंतु तालुक्यात अशा प्रकारचे धोरण कुठल्याही पक्षाने राबविले नाही.
गावकऱ्यांना या अशा घाणेरड्या राजकारणाचा वास आता येऊ लागला आहे ही श्रीवर्धनच्या भविष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आपापले गाव सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक गाववाल्यांचीच आहे. इतकी वर्षे समर्थपणे चालणारे गाव आता अशा राजकारण्यांच्या दावणीला बांधण्यात काहीच फायदा नाही. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या अशा पुढाऱ्यांना गावबंदीमुळे तरी अक्कल येईल का?
Labels:
Politics,
Shiv Sena,
Shrivardhan
Monday, 24 January 2011
हिंदुस्थानात तिरंगा फडकविणे म्हणजे गुन्हा?
भाजपच्या युवक मोर्च्याने २६ जानेवारी हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी काश्मिरमधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकविण्याचे ठरविले आणि तशी तिरंगा यात्रा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून सुरु झाल्या. परवा २६ जानेवारी आहे, तिरंगा यात्रा आज पंजाबमधून काश्मिरच्या दिशेने निघत आहे. परंतु काश्मिरमधील सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मुख्यमंत्र्यांना भिती वाटतेय की यामुळे काश्मिरचे सामाजिक स्वास्थ बिघडेल, काश्मिरमध्ये अशांतता पसरेल..
भाजपसुद्धा काश्मिरमध्ये तिरंगा फडकवून लोकांपर्यंत पोहचण्याचे राजकारण करतेय हे सत्य आहे. परंतु चुकीचे असे नक्कीच काही करत नाही. ज्या राज्यघटनेचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच घटनेच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे हे कॉंग्रेसच्या दृष्टीने पाप म्हटले जातेय, हे राज्यघटनेचेच दुर्दैव म्हणायला हवे. भाजपवाले तिरंगा आपल्याच देशाच्या जमिनीवर फडकवत असल्याने त्यात विशेष असे काहीच म्हणता येणार नव्हते, पण तो तिरंगा भाजपवाले फडवत आहेत म्हणून कॉंग्रेसच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांनी यामध्ये राजकारण आणले.
कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील फुटीरतावाद्यांमुळे अगोदरच तिथे अशांतता असताना तिरंगा फडकविल्याने आणखी परिस्थिती खराब होईल म्हणजेच हे दोन्ही पक्ष स्वत:च सांगत आहेत की यांना सरकार चालविणे कठीण जातेय. फुटीरतावादी शक्ती या देशात पसरविली कोणी? तर कॉंग्रेसवाल्यांनीच! तब्बल ६० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसने या देशासाठी काहीच केले नाही हे सत्य आहे, परंतु जर काही केले असेल तर देश-विघातक कारवाया करणाऱ्यांचे बळ वाढविणे. याबाबतीत पुढे कॉंग्रेसवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल म्हणजेच कॉंग्रेसवाले सर्वसामान्यांची किती काळजी घेत आहेत बघा!
काश्मिरमध्ये तिरंगा फडकविल्याने हिंदुस्थान देशातील एका प्रांताचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडू शकते? असे म्हणणाऱ्यांना उघडे करुन चाबकाचे फटके दिले पाहिजेत. जर तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याने देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे त्याची जबाबदारी कॉंग्रेस घ्यायला तयार आहे? अफजल गुरुने देशाच्या संसदेवर हल्ला करुन देशाचे नाक कापून देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवले त्याला सुप्रिम कोर्टाने ऑक्टोबर २००६ ला फाशीची सजा दिलीय पण कॉंग्रेसवाल्यांनी त्याला सोनियाचा जावई बनवून ठेवला घेतला आहे. २६/११ ला मुंबईमध्ये ७२ तास धुमाकूळ घालणाऱ्या कसाबच्या टोळीने आणखी एकदा देशाची मान शरमेने झुकवली, पंतप्रधान मुंबईकरांचे कौतुक करतात पण कसाब कसा सुरक्षित राहिल याची काळजी कॉंग्रेसवाले आणि सोबत राष्ट्रवादीचे आबा पाटील आणि भाजपाचे एकनाथ खडसे करत आहेत. मुंबईमधील वाढत्या लोंढ्यांनी मुंबईचे स्वास्थ्य रोजच बिघडत आहे. मुंबईची अवस्था परप्रांतियांनी खराब केली आहे. करदात्या मुंबईकरांना सुविधा पुरविताना महानगरपालिकेच्या नाकी नऊ येत असताना इथेही कॉंग्रेसवाले काही ठोस निर्णय घेत नाहीत, आणि तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ बिघडेल म्हणून इतकी काळजी?
या सर्व गोष्टींना कोण जबाबदार असेल तर जनता. झोपी गेलेली जनता कधी जागी होणार आहे की नाही ते माहित नाही. देशप्रेमींना या देशात देशद्रोही ठरविण्याचे काम कॉंग्रेस मागची अनेक वर्षे करीत आहे. सावरकर्, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचा कधीही सन्मान केला गेला नाही. तरीही ही झोपी गेलेली जनता आजही कॉंग्रेसच्या चिपळ्या वाजवतेय हेही या देशाचेच दुर्दैव!
Thursday, 13 January 2011
तुम्ही क्लिन आहात, पण तुमच्या मंत्र्यांचे काय?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक आश्वासने देण्याचा सपाटा लावत सुटले आहेत. ‘आदर्श घोटाळ्या’च्या पार्श्वभूमीवर श्री. पृथ्वीराजांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने छाप पाडण्यासाठी तसेच आपली क्लिन प्रतिमा कायम ठेवण्यासाठी सतत भ्रष्ट्राचाराविरोधात भूमिका घ्यावीच लागणार आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग हे सुद्धा मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जातात. विरोधकसुद्धा त्यांना याच नावाने संबोधतात तसेच काहीसे पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत बोलले जाते. अनेक वर्षांनी महाराष्ट्राला कॉंग्रेसने दिलेला चेहरा लोकांच्या पसंतीस उतरला. सरळ आहे एवढ्या मोठ्या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने त्यांच्या मंत्रीमंडळात भ्रष्ट्राचारी मंत्रींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
पृथ्वीराजांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वात पहिली घोषणा केली ती स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच मंत्री करणार. या घोषणेने कॉंग्रेसमधील अनेकांचे धाबे दणाणले. नुकतेच मुख्यमंत्रीपदासाठी धावपळ करणारे नेते आता मंत्रीपद मिळण्यासाठी दिल्लीसाठी रवाना झाले. भ्रष्ट्राचारी नेते आता अडगळीत जाणार असे लोकांना वाटू लागले पण लोक एक विसरले की पृथ्वीराज जरी चांगले नेते असले तरी ते कॉंग्रेसचे नेते आहेत. मनमोहनसिंगांसारखेच पृथ्वीराजांच्या हातात फक्त मुख्यमंत्रीपद आहे, त्यांना कामे ही सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसारच करावी लागणार आहेत. आणि पृथ्वीराजांच्या पहिल्या घोषणेचेही तीन-तेरा वाजले. नारायण राणे पासून अनेक् भ्रष्ट्राचाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले.
कालच पृथ्वीराजांनी म्हटलेय की, भ्रष्ट्र राजकारणी, बिल्डर आणि प्रशासकीय मंडळींनी मुंबई विकायला काढलीय. मिडीयामध्येही याला चांगली प्रसिद्धी मिळाली. मुख्यमंत्री हे बोलत असल्याने सध्याच्या कॉंग्रेसचे सरकार भ्रष्ट्राचारी आहे हे सिद्ध होतेय. पण नुसते बोलून काय होणार आहे. मुख्यमंत्री या सरकारचे प्रमुख आहेत जी कोणी मंडळी मुंबईचे लचके तोडत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना घटनेने दिलेले आहेत. आजपर्यंत मनमोहन सिंगांनी केलेली अशी वक्तव्ये आपण पेपर आणि मिडीयामधून ऐकली आहेत पण त्याने केंद्रातील भ्रष्ट्राचार कमी झालेला नाही. आपले दुर्दैव हेच की आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रमुखपदी अतिशय चांगल्या प्रतिमेचे लोक बसले आहेत पण ते भ्रष्ट्राचार कमी करु शकतील याची जनतेला बिल्कुल खात्री नाहिये.
पृथ्वीराज बोलले पण पुढे काय? आजच्या केंद्रसरकारमध्ये अनेक घोटाळेबाज नेते आहेत तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती आहे. पण यावर आवर घालायला दोन्ही प्रमुखांची तयारी नाही कारण ते आपल्या कर्तुत्वाने प्रमुखपदी आलेले नाहीत त्यांना सोनिया गांधींनी प्रमुख केलेय.
Tuesday, 4 January 2011
’बहुमता’चा गैरवापर
मागच्या आठवड्यात पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याबाबतीत जे घडले ते केवळ दुर्दैव होते. राजकारणी आपले पाप लपविण्यासाठी कुठल्या थराला जातील याचेच हे उदाहरण म्हणता येईल. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे आपण सर्वजण अनेकवर्ष इतिहासात वाचत आलोय आणि आज अचानक कळतेय दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते म्हणून त्यांचा लालमहालातील पुतळा कापून काढण्यात आलाय.
खरचं दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते म्हणून पुतळा काढला गेला? नक्कीच नाही! यामागचे गुपित हेच आहे की, देशात वाढणारी महागाई, लवासा प्रकरण, आदर्श घोटाळा, २जी स्पेक्ट्रम घोटाळा यामुळे महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीची प्रतिमा जनतेमध्ये अतिशय मलिन झालेली आहे. खुद्द कृषीमंत्री महाराष्ट्रातील असल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या पाहता, शरद पवार जनतेला आता उत्तर देऊ शकत नव्हते. केवळ सरकारची झालेली पंचायत पाहता जनतेचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी वळले पाहिजे याचसाठी हे प्रकरण जाणूनबुजून करण्यात आले.
देशात शिवसेना-भाजपला कॉंग्रेसवाले हिंदुत्ववादी म्हणून जातियवादी शक्ती म्हणतात पण धर्मावर आधारित राजकारण करणारे पक्ष जातियवादी होऊ शकत नाहीत हे आपण सर्व जाणतोच! आज महाराष्ट्रात जे चाललेय त्याला जातियवाद म्हणता येईल. केवळ ब्राम्हणांनी इतिहास लिहिला म्हणून तो पुसून टाकून आपल्या जातीतील इतिहासकारांचाच इतिहास खरा मानला गेला पाहिजे हे म्हणजे जरा अतिच झाले की राव! इथे इतिहास तज्ञच केवळ यावर जास्त चांगले बोलू शकतात किंवा लिहू शकतात त्यामुळे कुठलेही वाद-विवाद जे असतील ते त्यांच्यातच राहिले पाहिजे. पण पुण्यात जे घडले ते केवळ अचंबित करणारे होते. पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेत बहुमताच्या जोरावर हे सगळे घडवून आणले. आता यावर काय कपाळ आपटणार?
जर सगळीकडे बहुमताच्या जोरावर असे काही घडायला लागले तर त्यात लोकशाहीची उरलेसुरलेली वस्त्रेही गळून पडतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काही कायमस्वरुपी सत्ता उपभोगायला मिळाली असल्याच्या थाटात ते वागत आहेत. पण भस्मासुर जसा शंकरावर पालटला तसाच सत्तेचा भस्मासुर यांच्यावर पालटू शकतो. आज सत्ता आहे म्हणून मनात येईल तसे वागायचे आणि जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्याला हवा तसा पैसा कमवायचा हे कुठले धोरण आहे? बहुमताच्या जोरावर सगळ्या गोष्टी होणार असतील पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयावर राज्यातील आघाडी सरकार कानावर हात ठेवणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने बहुमताच्या जोरावर लोंढ्यांच्या बाबतीत असलेली भूमिका बहुमताने पास केली तर त्याला कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाले विरोध करणार नाहीत का? आघाडी सरकार कानावर हात ठेवून तो त्यांच्या बहुमताच्या जोरावर घेतलेला निर्णय मानून गप्प बसतील का? तर नक्कीच नाही!
म्हणून यासरकारने आपले घोटाळे बाजूला ठेवून अशाप्रकारचे सुडबुद्धी राजकारण करु नये. काही वर्षापूर्वी बिहार-उत्तरप्रदेश मध्ये सत्तेच्या बळावर विरोधकांवर सुडबुद्धीचे राजकारण चालायचे. आज बिहारची प्रतिमा देशात अतिशय सुधारलेली आहे. मग म्हणून आपला पुरोगामी महाराष्ट्र आता बिहारच्या दिशेने वाटचाल करणार का?
Subscribe to:
Posts (Atom)


